पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २१ मे
खर्डा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या पुरातन निंबाळकर गढीची मोठी दुरावस्था झाली असून या गढीची भव्य दगडी व विटांचे बांधकाम असलेली तटबंदी ढासळत असल्याने या गढीची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशी करीत आहेत. याबाबत राज्य पुरातत्व विभागाकडेही तशी केली आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याने येथील रहिवासी भयभीत झाले आहेत. तरी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून गाडीची दुरूस्ती न केल्यास येणाऱ्या पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
गढीच्या चारही बाजूलगत रहीवाशी इमारती आहेत. नुकतीच या गढीची पश्चिमेकडील तटबंदी खर्डा परिसर तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या निवासस्थानावर कोसळली असता सुदैवाने कुटुंबीय वाचले. यामुळे गुढीच्या दुरुस्तीची मागणी जोर धरु लागली आहे. या बाबत पुरातत्वच्या नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालिका सौ. आरती आळे यांच्याकडे विजयसिंह गोलेकर यांनी तक्रार केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुरातत्वचे जतन सहाय्यक विजय धुमाळ यांनी भेट देत पंचनामा केला. आ. रोहित पवार यांनीही या गढीच्या पडझडीची पाहणी केली. परंतू, येणारा पावसाळा पाहता या भग्न गढीच्या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रहावे लागणार आहे. साधारण १७५ फुट रुंदी व २०० फुट लांबी असलेल्या या भव्य गढीच्या दगडमातीच्या भरावाची उंची साधारण ४५ फुटांपेक्षा जास्त असून त्यावर दोनमजली बांधकाम आहे.यासंबंधी तातडीने निधी उपलब्ध करत निंबाळकर गढीची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
१९९३ साली झालेल्या भूकंपात या गढीचे खूप मोठे नुकसान झाले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून बांधलेल्या जामखेड रोडवरील शाळेच्या नवीन इमारतीत टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर वापराविना पडून असलेल्या या भव्य गढीची दुरावस्था झाली असून सध्या तर फारच भग्नावस्था झालेली आहे. गढीवरील इमारतींची पडझड झाली असून तत्कालीन मैदानावर झाडाझुडपांचे जंगल तयार झाले आहे.
No comments:
Post a Comment