धाराशिव प्रेम प्रकरणातून भूम तालुक्यातील पाथरूड येथील एका 18 वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ जणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केल्यानंतर मृत झाल्याचे समजून त्यास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना आहे.
हा तरुण सोलापूर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून, याप्रकरणी परंडा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. भूम तालुक्यातील पाथरूड येथील माऊली बाबासाहेब गिरी, असं अमानुष मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वडिलांना माऊलीचा फोन आला.
माऊलीच्या वडिलांनी परंडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, 3 मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास माऊलीचा त्यास परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील सतीश जगताप आणि इतर सहा ते सात जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन आला होता. यानंतर त्यास फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ आणि मित्राला याबाबतची माहिती देऊन शोध घेण्याची विनंती केली.
विवस्त्र करून फेकून दिलं...
सायंकाळी 5 वाजता काळेवाडी येथील पोलिस पाटलांनी बाबासाहेब गिरी यांना फोन करून त्यांचा मुलगा माऊली यास जबर मारहाण करून त्यास विवस्त्र पश्चिम पांढरेवाडी ते कोकणे वस्ती रस्त्यालगत फेकून दिल्याचं सांगितलं. यावरून माऊलीला जामखेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, उपचारानंतरही सुधारणा होत नसल्याने त्यास सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथं त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, याबाबत बाबासाहेब गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा ठाण्यात आरोपी सतीश जगताप आणि अन्य सहा ते सातजणांवर गुन्हा दाखल करून यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा