जामखेड प्रतिनधी:१७ सप्टेंबर
विधानसभा दूर असल्या तरी कर्जत-जामखेडमधील राजकीय वातावरण मात्र नेहमीप्रमाणेच तापलेले आहे. विषय कोणताही असो, त्यात पवार-शिंदेमध्ये श्रेयवादाची लढाई कायमच रंगताना दिसली.
आता सीना धरणाच्या जलपूजनालाही राजकीय झालर लागली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी 'सीना'चे जलपूजन केले, त्यानंतर, भाजपाकडून आमदार राम शिंदे आणि आमदार सुरेश धस यांनीही दुसर्यांदा जलपूजन केले. त्यामुळे आता एकाच धरणाचे दोन वेळा आणि तेही चार-चार आमदारांनी जलपूजन केल्याने राष्ट्रवादी आणि भाजपमधील श्रेयवादाची ही चढाओढ चर्चेचा विषय ठरली आहे.
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण नुकतेचं ओव्हर फ्लो झाले आहे. मात्र धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सीना धरणात भोसे खिंड बोगद्यातून कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले होते. पावसाचे पाणी आणि कुकडीचे पाणी मिळून हे धरणं भरले आहे. धरण भरल्यानंतर आमदार रोहित पवार व राम शिंदे यांनी सोशल मीडियावर कुकडीच्या पाण्याने व पावसाने हे धरणं भरल्याची पोस्ट केली होती.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी काल गुरुवारी सकाळी येथील धरणाच्या पाण्याचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या समवेत जलपूजन केले. तर माजी मंत्री आमदार राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनीं सायंकाळी पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्यासमवेत जलपूजन केले. यावेळी कर्जत व आष्टी तालुक्यातील पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, एकाच धरणाचे दोन वेळा व आणि तेही चार आमदारांच्या हस्ते झालेले जलपूजन तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे. सीना धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर श्रेयवादाची ही लढाई अजून काही दिवस सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे, जलपूजनातील ही चढाओढ पाहता लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या जिव्हाळाचा विषय असलेले हे सीना धरण नेमके राष्ट्रवादी की भाजपाच्या प्रयत्नामुळे भरले, याविषयी ग्रामस्थांमध्ये अजूनही संभ्रम कायम असल्याचेच बोलले जाते. येणार्या काळात हे राजकारण आणखी पेटणार आहे.
No comments:
Post a Comment