जामखेड प्रतिनधी१८ नोव्हेंबर
पाण्याअभावी कर्जत-जामखेड मतदारसंघातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो असे आमदार होण्यापूर्वी रोहित पवार यांना समजल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचा शब्द निवडणुकीत दिला होता आणि त्यानुसार आमदार झाल्यानंतर त्यांनी आपला शब्द पाळत जलजीवन मिशन योजनेंतर्गत मतदारसंघातील सर्व गावांचा समावेश देखील करून घेतला. नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आणि कार्यारंभ आदेशही तीन महिन्यांपूर्वी निघाले पण अजूनही कोंभळीसह १२ गावे, मिरजगाव आणि खर्डा येथील जनता तहानलेलीच आहे. कारण वर्क ऑर्डर निघून ३ महिने झाले तरी प्रत्यक्षात काम मात्र सुरू नव्हते. परंतु याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित विभागाकडे आ. रोहित पवार यांनी पाठपुरावा केल्यामुळे नुकतेच मिरजगावचे काम सुरू करण्यात आले आहे. व कोंभळी येथे पाईप देखील आणण्यात आले आहेत. या कामाची शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी आमदार झाल्यानंतर रोहित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून सर्वेक्षण करून घेतले व मतदारसंघात कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आणि त्यासाठी लागणारा आवश्यक तो सर्व पाठपुरावा देखील शासनदरबारी त्यांनी केला हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे मतदारसंघातील विविध भागातील पाण्याची अडचण दूर देखील होत आहे. परंतु राजकीय फायद्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांवर दबाव आणला जात असल्याने काम थांबले आणि त्याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, वर्क ऑर्डर देऊन ३ महिने उलटले असतानाही काम सुरू झाले नसल्याने विरोधकांनी दबावतंत्राचे राजकारण थांबवावे असे आवाहन करत "मागील दाराने येऊन कोणी दबावाचे राजकारण करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या हक्काचं पाणी रोखत असेल तर आम्ही अशाच्या तोंडचं पाणी पळवल्याशिवाय राहणार नाही", अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर आपली तोफ डागली आहे. वर्क ऑर्डर देऊन आता ३ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे त्यामुळे खरं तर मतदारसंघातील पाण्याची गरज लक्षात घेता लगेचच कामाला सुरुवात होणं गरजेचं होतं. परंतु राजकीय फायद्यासाठी सत्तेचा गैरवापर करून दबावतंत्राचा वापर होत असेल तर ते नक्कीच निंदनीय आणि विकासाला बाधा आणणारं आहे. परंतु आता मिरजगावचे काम सुरू झाले आहे आणि या प्रमाणेच जनतेच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे यासाठी आमदार रोहित पवार अजूनही प्रयत्नशील आहेत.
प्रतिक्रिया
नकारात्मकतेचं आणि द्वेषाचं राजकारण जर काही लोकांनी केलं आणि त्यामुळे विकासाला बाधा आली तर मतदारसंघातील जनता शांत बसणार नाही. तसेच मिरजगाव व कोंभळी येथील कामांना गती सध्या गती देण्याची गरज असून खर्डा येथील काम देखील लवकरात लवकर सुरू होण्यासाठी मी अधिकारी आणि मंत्री महोदयांबरोबर चर्चा केली आहे व वैयक्तिक पातळीवर याकडे माझं लक्ष आहे.
- आमदार रोहित पवार
No comments:
Post a Comment