जामखेड प्रतिनिधी - २२ डिसेंबर
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पिंपळवाडी गावाला भेट दिली. यावेळी गावातील महिला आणि ग्रामस्थांनी गावातील पाणी, गटारीचे बांधकाम आणि इतर मूलभूत समस्या गटविकास अधिकारी यांच्याकडे मांडल्या. यावेळी विशेषत: महिलांची आक्रमता पाहायला मिळाली. महिलांनी ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा पाढाच वाचला. यावेळी पोळ यांनी ग्रामस्थांना लवकरच बैठक लावून प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये मांडलेल्या काही समस्या. पिंपळवाडी हे गाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने, गाव विकासापासून वंचित आहे. साकत ग्रामपंचायचे ग्रामसेवक गाव पिंपळवाडी येथे कधीही गावातील समस्यांसंदर्भात बैठक बोलावत नाहीत आणि नागरिकांचे प्रश्न जाणून घेत नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजना राबविण्यात आली तरीही गावाला मात्र याचा कधीच लाभ मिळाला नाही. गावात बंदिस्त गटार बांधण्यात यावेत. गावामधे कित्येक महिन्यांपासून फिल्टर प्लांट उभारला आहे मात्र तो अजून सक्रिय नाही. सिमेंट काँक्रिट रस्ते आणि ब्लॉक बसवण्यात यावेत. अशा अनेक समस्यांचा निवेदनामध्ये उल्लेख होता.
गावातील पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा महिलांनी इशारा दिला आहे.
यावेळी युवक क्रांती दलाचे तालुका अध्यक्ष विशाल नेमाने, उपाध्यक्ष विजय घोलप, बचत गट समन्वयक गोजर नेमाने, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मण घोलप, प्रताप घोलप, ओंकार घोलप, योगेश नेमाने, सनी घोलप, अशोक नेमाने, सुरेश नेमाने व इतर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment