कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मतदारसंघातील बंधारे आणि डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या कामाला गती देण्याची मागणी केली आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या डिंबे-माणिकडोह बोगद्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली असून यामुळे पावसाळ्यात डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरिक्त पाणी हे या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात साठवता येणार आहे. यामुळे कर्जतसह पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा या तालुक्यांना कुकडी प्रकल्पातून एक अतिरीक्त आवर्तन मिळणार आहे. शिवाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर या तालुक्यांचा पाण्याचा कोटाही अबाधित राहणार असून त्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
माणिकडोह धरणाच्या पाणलोटक्षेत्रात कमी पाऊस पडत असल्याने साधारणपणे हे धरण पाच वर्षांतून एकदाच भरते, परंतु डिंभे-माणिकडोह बोगद्याचे काम लवकर मार्गी लागल्यास डिंभे धरणातून वाहून जाणारे पावसाचे अतिरीक्त पाणी बोगद्याच्या माध्यमातून माणिकडोह धरणात साठवता येईल आणि हे धरण दरवर्षी भरणार असल्याने भविष्यात कुकडी प्रकल्पासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही. कर्जत तालुक्यासाठी कुकडी प्रकल्प हा महत्त्वाचा असल्याने या कामाला गती देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने यामध्ये लक्ष घालून या कामाला गती देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली. यासोबतच कुकडी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाला नाही. यातील अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी फडणवीस यांच्याकडे केली.
तसेच अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना नदीवर एकूण पंधरा कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. त्यापैकी कर्जत तालुक्याच्या ६ तर आष्टी तालुक्यात ९ बंधारे असून या बंधाऱ्याच्या लोखंडी दरवाजाची पद्धत कालबाह्य झाल्याने मनुष्यबळाअभावी आणि देखभाल दुरुस्ती अभावी या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांचे लातूर पद्धतीच्या बंधाऱ्यात रुपांतर करण्यास महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिली असून त्याचा प्रकल्प अहवाल बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. याचा फायदा कर्जत आणि आष्टी या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असून मोठ्या प्रमाणात शेत जमिन ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या कामालाही गती देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याकडे केली.
प्रतिक्रिया
"सरकार हे कोणत्या पक्षाचे नसते, तर संपूर्ण जनतेचे असते. त्याअनुषंगाने मतदारसंघातील विविध प्रश्न सरकारदरबारी मांडून ते सोडवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. डिंभे-माणिकडोह बोगदा आणि बंधाऱ्यांची कामे माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून सहकार्य मिळेल, असा विश्वास आहे."
रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा