जामखेड प्रतिनिधी: २४ सप्टेंबर
शासनाच्या धोरणानुसार “माझी शेती माझा ७/१२ मीच लिहील माझा पीकपेरा” या योजनेखाली प्रत्येक शेतकरी खातेदार यांना आपल्या शेतात केलेल्या पिकाचा पीकपेरा स्वतः करावा लागणार आहे. सध्या खरीप हंगाम चालू असून सुधारित पिक पाहणी अप च्या माध्यमातून खरीप पिक पाहणी करण्याचे काम चालू आहे. परंतु अद्यापही बऱ्याच खातेदार यांनी पिक पाहणीची नोंदणी केलेली नाही. जामखेड तालुक्यात एकूण ७१२०० खातेदार असून आत्तापर्यंत फक्त ९००० खातेदार यांनी पिक पाहणी ची नोंद केलेली आहे. त्यामुळे खातेदार यांची पिक पाहणीची नोंद न झाल्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तलाठी यांचेमार्फत प्रत्येक गावामध्ये याबाबत प्रचार प्रसिद्धी केलेली आहे.
याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले की, मार्गदर्शन कॅम्प घेतेलेले आहेत, तरीही यामध्ये खातेदार यांची उदासीनता दिसून येत आहे. पिक पाहणी न झाल्यामुळे पिक विमा, खरेदी विक्री, नुकसान भरपाई अनुदान या शासनाच्या विविध योजनासाठी अडचणी येऊ शकतात. सद्यपरिस्थितीत ऑनलाईन पीक पाहणी तलाठी यांना करता येत नाही. त्यामुळे पिक पाहणी तलाठी करून घेतील या मानसिकतेत न राहता प्रत्येक खातेदार यांनी आपल्या पिकाचा पीकपेरा स्वतः करुन घ्यावा. पिक पाहणी करत असताना काही तांत्री अडचणी आल्यास आपल्या गावाचे तलाठी यांच्याशी संपर्क करावा. सर्व खातेदार यांना शासनाने आपल्या शेतातील पिक पेरा स्वतः करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा सर्व खातेदार यांनी लाभ घेऊन लवकरात लवकर आपली पिक पाहणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे व महसूल विभागामार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment