जामखेड प्रतिनिधी : १० आॅक्टोबर
धनगर समाजातील पात्र व वंचित कुटुंबासाठी घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंचायत समिती जामखेडच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून धनगर समाजातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करावा असे आवाहन पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
पात्रता अटी-
१. ही योजना फक्त धनगर समाजासाठी (भटक्या जमाती क प्रवर्गासाठी) लागू राहील.
२. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
३. लाभार्थी बेघर असावा अथवा झोपडी/ कच्चे घर /पालामध्ये राहणारा असावा.
४. सदर लाभार्थ्याचा समावेश पंतप्रधान आवास योजनेतील ड यादीमध्ये नसावा.
५. लाभार्थ्याकडे 269 चौरस फूट घराचे बांधकाम करता येईल इतपत स्वतःची जागा असावी.
इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज व इतर कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये जमा करावी. अर्जाचा नमुना ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती घरकुल कक्षामध्ये मिळेल. प्रथम अर्ज देणाऱ्यास प्राधान्य राहील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
१)लाभार्थ्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, २)जातीचा दाखला (NTC प्रवर्ग) ३). तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला जास्तीत जास्त 1.20 लक्ष रु वार्षिक ४) जागेचा उतारा, ५) राष्ट्रीयीकृत बँक खात्याची पासबुक प्रत, ६) MREGS जॉबकार्ड, ७) आधार कार्ड, ८) रेशन कार्ड,
शासन निर्णय 6 सप्टेंबर 2019 नुसार यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या अटी शर्ती लागू करून धनगर समाजातील पात्र व वंचित कुटुंबासाठी घरकुल योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अंतर्गत घरकुल मंजूर झालेनंतर लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी 1.20 लक्ष, MREGS अंतर्गत बांधकाम मंजुरी 23040 रु आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम करणेसाठी 12000 रु असे एकूण 155040 रु अनुदान देण्यात येईल. लाभार्थ्यांना किमान 269 चौ.फु. बांधकाम करावे लागेल. घरकुल व MREGS चा निधी बांधकाम टप्प्यानुसार 4 हप्त्यात देण्यात येईल. तेव्हा इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ग्रामपंचायतला अर्ज सादर करावेत असे आवाहन जामखेड पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment