पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २३ जुलै
खर्डा गावच्या पुढाऱ्यांनी ग्रामपंचायतचे विभाजन व विकासात खोडा घातल्यास आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ तसेच आम्ही एकत्र आलेले युवक कोणत्याही राजकीय पक्षाच्या आश्रयाखाली काम करीत नाहीत तर आमचे "शिवपट्टण " एक गाव, एक विचार"" अशा पद्धतीने काम करणार आहेत. असे म्हणत आक्रमकपणे व तीव्र भावनेने युवक आपले प्रश्न मांडत होते. यावेळी ग्रामस्थांचा आरोप होता की भाजपा नेते रवींद्र सुरवसे हे या युवकांच्या एकजुटीला कशी फाळणी पडेल व ग्रुप कसा तुटेल यांच्या दोन कशा फाळण्या होतात याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपस्थित तरूणांमधून तिव्र प्रतिक्रिया उमटत होत्या.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल दि. २२ जुलै रोजी खर्डातील युवकांनी 'एक गाव एक विचार "अशी संकल्पना बाळगून त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
आजपर्यंत गावच्या पुढाऱ्यांनी केलेल्या कामांमधील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याची आक्रमक भूमिका शिवपट्टण युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भाजपाने गाव विभाजन व गाव बंदच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेचा खरपूस समाचार घेऊन युवकांनी आरोप करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
आमचा लढा हा खर्डा गावच्या विकासासाठी असून आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपचे काही नेते आमच्या कार्यकर्त्यांना फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आम्ही कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही. असे युवकांनी ठणकावून सांगितले. याअगोदर ग्रामपंचायत वर भाजपाची सत्ता होती, मागील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे बोगस झाली असून खैरी प्रकल्पातील पाण्याच्या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आजही गावात नळाला गढूळ पाणी येत असून पाण्याची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विकतचे पाणी घेऊनच प्यावे लागत असून नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसत आहेत. पाणी फिल्टर करण्याचा प्लांट हा अतिशय नित्कृष्ट दर्जाचा झाला असून काम पूर्ण नसतानाही योजना ताब्यात घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
खर्डा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यासाठी व सहा वाड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासाठीचा वाद टोकाला जात असताना झालेल्या ग्रामसभेत व मासिक मीटिंगमध्ये मोठे वादळ निर्माण झाले होते. या सभांमध्ये घेतलेल्या ठरावांवर ग्रामपंचायतच्या सत्ताधारी सदस्यांनी भूमिका बदलली होती. या अनुषंगाने खर्डा ग्रामस्थांच्या वतीने काल दि. २२ जुलै रोजी सिताराम गडावर पत्रकार परिषद घेऊन युवकांनी आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही परिस्थितीत वाड्या स्वतंत्र करण्यासंदर्भात कोणतीही लढाई लढण्यास आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांनी केलेल्या आरोपाचे खंडनही कार्यकर्त्यांनी केले असून कोणताही राजकीय नेता आमची माथी भडकावीत नसून स्वयंस्फूर्तीने गावचे विकासासाठी आम्ही लढा सुरू केला आहे. इथून पुढच्या काळात विकासाच्या कामात गावच्या पुढाऱ्यांनी खोडा घातल्यास आगामी निवडणुकीत आम्ही सर्व शिवपट्टण विकास युवा मंचचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ तसेच दि. २४ जुलै सोमवार रोजी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामपंचायत विभाजन करण्याचा ठराव घेण्यात येणार आहे. तो संमत झालेला ठराव जर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला नाही. तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करू तसेच गावात शांतता व विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. असे शिवपट्टण विकास युवा मंचचे प्रवक्ते गणेश ढगे यांनी आपले म्हणणे पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment