पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ ऑगस्ट
निवारा बालगृहात आल्यानंतर अरूण आबांच्या रुपात अनाथांचा बाप या ठिकाणी मला पहावयास मिळाला. याचा मला खूप मोठा आनंद झाला. असे प्रतिपादन आमदार सुरेश (आण्णा) धस यांनी केले.
ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सव या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ऊसतोड कामगाराचा मुलगा नवनिर्वाचित डी. वाय. एस. पी. संतोष खाडे , ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव, जामखेडचे नायब तहसीलदार अनारसे , मंडळ अधिकारी गव्हाणे , कर्जत वृद्ध भूमिहीन संघटनेचे अध्यक्ष शब्बीर भाई पठाण, भोरे मेजेर,ॲड.हर्षल डोके, संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ, सचिवा उमाताई जाधव, आदी मान्यवर यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.
आमदार सुरेश धस म्हणाले की, ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणजे उपेक्षितांचा आवाज आहेत. अनाथ निराधार मुलांना सांभाळणे हे फार पुण्याचं काम आहे. ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे काम गोरगरीब कष्टकरी वंचितांसाठी खूप मोठं आहे, अन्याय अत्याचार हे ज्यांनी भोगलं त्यालाच ते दुःख कळत असे सांगून निवारा बालगृह व आईचं घर या दोन्ही प्रकल्पांसाठी आबा तुम्ही सांगेल ती मोठी मदत मी करेल व या संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहु असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना नवनिर्वाचित डी वाय एस पी संतोष खाडे म्हणाले की, मी मुळातचं ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. उपाशी असणारीचं माणसं काहीतरी इतिहास करून दाखवतात. या मुलांना लाजवेल असे अनाथांसाठी निवारा बालगृह अरुण आबांच्या रूपाने मिळालेले आहे. आपले दैवतचं पुस्तक आहे. त्यामुळे माणसात देव शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगून माझ्या नोकरीतील एक पगार निवारा बालगृहातील मुलांच्या शैक्षणिक साहित्य व पुस्तकांसाठी दिला जाईल असे ते म्हणाले.
पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की जीवन कसं जगावं ते बालगृहात आल्यानंतर समजते. आबांचे मी अनेक रूप पाहतो त्यांच्याकडे अनेक पैलू आहे ते स्वतः त्याग करतात त्यांचं झपाटलेलं व्यक्तिमत्व आहे,समाजात कोणीही मुलांना मारून टाकु नये त्यांना आबांच्या बालगृहात सोडावे. या ठिकाणी अनाथांना अन्न वस्त्र निवारा मिळतो असे सांगून त्यांनी अनाथांच्या दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार देऊन या मुलांसमवेत दिवाळी साजरी करणार असे ते म्हणाले.
ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, व्यवस्थेने नाकारलेल्या माणसांच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो. वंचित, निराधार, अनाथ, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निवारा बालगृहाची स्थापना केली आहे. आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीवरच हे वसतिगृह चालते. याला शासनाचे कुठलेही अनुदान नाही, असे ते म्हणाले.
निवारा बालगृहाचे स्वयंसेवक ज्यांनी या बालगृहाला अन्नधान्य, किराणा, शैक्षणिक साहित्य याची वर्षभरासाठी मदत मिळुन देणारे अभिनेता सचिन चव्हाण (भवरवाडी), सुदाम वायकर (कोपरगाव), लक्ष्मण मंडळे (कोपरगाव), बाळू मंडळे (श्रीगोंदा) यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
तसेच ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने भटके-विमुक्त, आदिवासी समाजातील लोकांना जातीचे प्रमाणपत्र मिळून दिले. त्याचेही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेस पुष्पहार अर्पण केले व वाचन करून या महोत्सवाचे उदघाटन झाले . यावेळी निवारा बालगृहाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला व मुलांना कपडे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शिवनेरी अकॅडमीचे संस्थापक भोरे मेजर यांचेही भाषणं झाले. बापु ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व वैजीनाथ केसकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार,सचिन भिंगारदिवे, तुकाराम शिंदे, अतुल ढोणे, ऋषिकेश गायकवाड, नंदकुमार गाडे सर, पुलवळे सर, तुकाराम पवार, राजू शिंदे, गणपत कराळे, द्वारका ताई पवार, पल्लवी शेलार,काजोरी पवार, लता सावंत, उज्वला मदने, रोहीणी राऊत,फरीदा शेख, दिपाली काळे, शुभांगी गोहेर, अर्चना भैलुमे, सुरेखा चव्हाण,छाया मोरे, गौतमी गंगावणे,पायल मुळेकर, प्रियंका घोडेश्वर, प्रतिक्षा शिंदे,राहुल पवार, सहानुर काळे,नर्सिंग भोसले आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment