पोलीस वारंट न्यूज नेटवर्क - ७ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गेली नऊ वर्षापासून प्रलंबित असणारा मुस्लिम मदारी समाजाच्या घरकुलांचा प्रश्न अखेर दिनांक ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन मार्गी लागला आहे.यासाठी खर्डा ग्रामपंचायतीने मोठे सहकार्य करून एक हेक्टर (अडीच एकर) जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अँड अरुण जाधव यांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश आल्याने खर्डा शहरात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
खर्डा येथे २०१५ साली भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील वर्षानुवर्षे झोपडीत राहणाऱ्या मुस्लिम मदारी समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना त्यांनी राज्य सरकारकडून मंजूर करून आणली होती परंतु या वसाहतीसाठी ग्रामपंचायतने जागाही उपलब्ध केली होती, काही कारणास्तव सदर जागेत दोन वेळा ऐनवेळी बदल करण्यात आला होता, त्यामुळे ग्रामपंचायतीला जागेचा नकाशा व इतर बाबी पूर्ण करण्यासाठी पहिल्यापासून सुरुवात करावी लागत होती, त्यातच सरकारी काम, आणि सहा महिने थांब, याप्रमाणे मदारी समाजाचा घरकुलांचा प्रश्न वर्षानुवर्षी पुढे ढकलत होता यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अँड अरुण जाधव हे सातत्याने मोर्चा, उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत होते.परंतु प्रत्यक्षात या घरकुल योजनेवर नऊ वर्षापासून शासनाने पैसे देऊन सुद्धा कागदपत्रांच्या अपुऱ्या कामामुळे व इतर वरिष्ठ अधिकारांच्या चालढकलीमुळे घरकुलाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. या योजनेत प्रत्येकी घरकुल योजनेसाठी एक लाख ५३ हजार रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले आहेत, प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांचा निधी नऊ वर्षापासून पडून आहे,साधारण त्याचे आजपर्यंत व्याज दहा लाख रुपयांच्या घरात गेले आहे, परंतु योजना काही मार्गी लागत नव्हती याबाबत खर्डा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. संजीवनीताई पाटील यांनी पुढाकार घेऊन सातत्याने गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर दिनांक ७ डिसेंबर रोजी मुस्लिम मदारी समाजाच्या घरकुल बांधकामाचा प्रत्यक्षात शुभारंभ करण्यात आल्याने मदारी समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. यासाठी खर्डा ग्रामपंचायत ने एक हेक्टर जागा कानिफनाथ मंदिराजवळ दिली आहे.या योजनेसाठी वीस घरकुलांसाठी बांधकाम होणार असून त्यासाठी पुढील काळात २८ घरकुल मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
सदर योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून होणार आहे.या वसाहतीच्या मध्ये रस्ते, पिण्याची पाण्याची सोय, नवीन गटार बांधकाम, लाईट व्यवस्था व सुशोभीकरण अशा प्रकारच्या सोयी या वसाहतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुस्लिम मदारी घरकुल वसाहत ही आगामी काळात जिल्ह्याला दिशादर्शक ठरेल असे बांधकाम करून एक आदर्श वसाहत म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल अशा प्रकारचे नियोजन खर्डा ग्रामपंचायत,ग्रामस्थ व आधिराऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
या घरकुल वसाहत योजनेच्या बांधकामाचा शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ ,विस्तार अधिकारी खैरे , माजी उपसभापती रवी सुरवसे, बाजार समिती संचालक वैजिनाथ पाटील, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महेश दिंडोरे, श्रीकांत लोखंडे, महालिंग कोरे, मनोज भोरे, विशाल पवार, गणपत कराळे, दादासाहेब दाताळ, बिभीषण परकड, राहुल पवार, पत्रकार दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, धनसिंग साळुंखे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, सलीम मदारी, हुसेन मदारी, सरदार मदारी, फकीर मदारी इत्यादी सह मुस्लिम मदारी समाजाचे कार्यकर्ते व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा